एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी टीका करत फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या राजेंच्या राजकीय प्रवासाचा शेवट नगरपालिकेची सत्ता गमावून झाला असल्याचे सांगत नगरपालिका निवडणुकीत फलटणकरांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी दि. २५ डिसेंबर रोजी भाजपा-राष्ट्रवादी युतीच्यावतीने फलटण येथील गजानन चौकात आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
स्वतःच्या ‘मी’ला महत्त्व देत दुसरे नेतृत्व उभे राहू नये म्हणून प्रयत्न करणारे नेते
विकासकामांसाठी प्रयत्न करणारे नेते मी पाहिले आहेत; परंतु काही नेते फक्त स्वतःच्या सत्तेसाठी काम करत आहेत. विकास थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. निरा देवघरचे पाणी येऊ नये, नाईकबोमवाडीतील एमआयडीसीची उभारणी होऊ नये, तालुक्यातून जाणारी रेल्वे आणि रुग्णालय यांसारखी कामे पूर्ण होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारे, या भागातील दुष्काळावर खतपाणी घालणारे नेते मी पहिल्यांदा पाहिले आहेत, असे सांगत विकासापेक्षा स्वतःच्या ‘मी’ला महत्त्व देत, तालुक्यात दुसरे नेतृत्व उभे राहू नये म्हणून षडयंत्र करणारे नेते या तालुक्यात असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.
डॉ.मुंडे प्रकरणाद्वारे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी शोधली
हे कधीही खरे लढवय्ये नव्हते. ते फक्त सत्तेचा उपयोग करून लोकांना बांधून ठेवत, दमबाजी करून त्रास देत सत्तेत राहिलेले होते. ज्या दिवशी सत्ता गेली त्या दिवसापासून ही माणसे अस्वस्थ झाली आहेत. २५ वर्षे रणजीत दादांनी आणि आम्ही संघर्ष केला आहे. आम्ही सामान्य माणसाच्या विकासाचे काम केले आहे, लोकांचा विश्वास संपादन केला आहे म्हणुनच पालिकेची निवडणूक जिंकली असल्याचे सांगत विधानसभेला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करायचे सोडून डॉ.संपदा मुंडे प्रकरणाद्वारे राजकीय पुनर्वसन करण्याची संधी विरोधकांनी शोधली असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.
विकासकामे मार्गी लावण्याची ताकद रणजीतदादांमध्ये
फलटण शहराच्या विकासाची जबाबदारी रणजीत दादांनी घेतली आहे. दादांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आहेत. आजपर्यंत जे जे रणजीतसिंह यांनी मागितले आहे, ते फडणवीस यांनी दिले आहे. विकासकामांमध्ये भूमिका कशी घ्यावी आणि पाठपुरावा कसा करावा हे रणजीतसिंह यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. रणजित दादा विकासकामांची फक्त पत्र देत नाहीत तर प्रत्यक्ष काम मार्गी लावण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
तालुक्यात १६ ग्रामपंचायतींची कार्यालये आम्ही दिली
नवीन आमदार निवडून आल्यानंतर कोणत्याही आमदाराला निधी मिळाला नाही, परंतु मी मंत्री झाल्यानंतर दादांनी माझ्या मागे लागून फलटण तालुक्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला असून फलटण तालुक्यात १६ ग्रामपंचायतींची कार्यालये आम्ही दिली आहेत. जर ही कार्यालये नव्हती, तर सत्ता असताना हे नेते काय करत होते असा प्रश्न गोरे यांनी यावेळी उपस्थित केला.
नादाला लागला तर सोडणार नाही
जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी बुथवर उभे राहून राजकारणामध्ये काम केले आहे. आम्ही शिक्षकांना कल्पना दिली होती की या भानगडीत पडू नका. मी शिक्षकांच्या बाजूने उभा राहणारा माणूस आहे, परंतु शासनाचा पगार घेत घर गड्याची कामे करत राहिलात, तर ही दुकानदारी चालणार नसल्याचे सांगत येणार्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत एकही तक्रार आली तर माफी मिळणार नाही, असे सांगत आमच्या नादाला कोण लागला तर त्याला सोडणार नसल्याचा इशारा जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.
२०० कोटींचा निधी देतो पंचायत समितीचा सभापती भाजपाचा करा
निवडणुकीत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेपुढे गेलो आणि निवडणूक जिंकली. आता फलटणकरांना विनंती आहे की, आपण लोकसभेला वेळ दिला, विधानसभेला आमदारकी दिली, नगरपालिका दिली आणि नगराध्यक्षही केला. आता मिनी विधानसभा म्हणजेच पंचायत समितीची निवडणूक आहे. येणाऱ्या निवडणुकीत दादांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी ताकदीने उभे रहा. पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पक्षाचा करा. सरकारने ५० कोटींचा कोटा दिला असेल तर मी २०० कोटींचा निधी देऊन फलटणमधील प्रत्येक रस्ता दुरुस्त करणार असल्याचे आश्वासन देत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागण्याचे आदेश गोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.
दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, अॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर, अनुप शहा, अॅड.नरसिंह निकम, दिलीपसिंह भोसले, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, सनी काकडे यांची भाषणे झाली.
प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. मेळाव्याच्या शेवटी विजयी झालेले सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार मंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते करण्यात आला. कुरेशी समाज आणि धुमाळवाडी ग्रामस्थांच्यावतीने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. आभार युवा नेते रणजितसिंह भोसले यांनी मानले
या आभार मेळाव्यासाठी फलटण शहरातील नागरिक, भाजपा-राष्ट्रवादी युतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...
एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...
एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...
एकता दर्शन (फलटण) : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी खासदार...